Mumbai Mahanagarpalika Bharti 2026
महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या वाहनचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. वाहनचालकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. चालकाची समस्या सोडवण्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता विनायक भट यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गुरव, राजेश इंदुलकर, विशाल गायकवाड, रमेश सोसे, योगेश नगर, अभिषेक लमाणे, सत्यम सावंत, बबन रहाटे, महेंद्र चारणिया, उप-प्रमुख अभियंता अनघा पडियार, कार्यकारी अभियंता पुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिकेने बी.ई.एस.टी.कडून 190 वाहनचालक उसनवारी पद्धतीने नियुक्त केले आहेत. या वाहकांची शहराच्या साफसफाई आणि घनकचरा वाहून नेण्यासाठी रिफ्युज कचरा गाडय़ांवर नेमणूक करण्यात येणार आहे. नवीन भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे चालक सेवा देणार आहेत. या प्रक्रियेत पालिकेच्या मूळ वाहनचालकांना परिवहन खात्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार काम दिले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून नवीन आस्थापनेवर वाहनांची खरेदी करून सेवा पुरवली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध अत्यावश्यक विभागांमध्ये दूरध्वनी चालक संवर्गातील तब्बल ३० पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त किशोर गांधी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दूरध्वनी चालक पदांची भरती प्रक्रिया महापालिकेकडून २०१६ नंतर करण्यात आलेली नाही. परिणामी, अनेक विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला असून विद्यमान कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.
पालिकेची रुग्णालये, पाणीपुरवठा खाते, विभागीय कार्यालये तसेच इतर अत्यावश्यक आस्थापनांनी रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दूरध्वनी सेवा ही महापालिकेच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाची कडी असल्याने रिक्त पदांचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मुंबईत झाडे पडून आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असूनही, महापालिकेच्या उद्यान विभागाला कर्मचारी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विभागातील ३६ महत्त्वाची पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. यामुळे शहरातील धोकादायक आणि सडत चाललेल्या झाडांची ओळख, तपासणी आणि त्यांच्यावर वेळेवर कारवाई करण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे आणि त्यांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडतात. या घटनांमध्ये अनेकदा वाहनांचे नुकसान होते, तर काही प्रकरणांमध्ये नागरिकांचा मृत्यूही होतो. असे असूनही, झाडांची नियमित तपासणी आणि धोकादायक झाडांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यान विभागातील विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या कर्मचारी तुटवड्यामुळे उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढत आहे. मुंबईसारख्या विशाल महानगरात हजारो झाडांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी पुरेसे तज्ञ आणि कर्मचारी आवश्यक आहेत.
अगोदरच प्रभावी यंत्रणा विकसित करावी
पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळेवर झाडांचे सर्वेक्षण करणे आणि आवश्यक कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, जर विभागात पदे रिक्त असतील, तर वेळेवर तपासणी आणि कारवाई कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अपघात झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी प्रशासनाने अगोदरच प्रभावी यंत्रणा विकसित केली पाहिजे. धोकादायक झाडे कोण ओळखणार आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे.
जुहू येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात जाहीर झालेल्या ३९ पदांच्या भरतीमुळे महापालिकेच्या रोजगार धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही भरती प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीसाठी नसून कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अल्पावधीत सेवा समाप्त करण्याच्या धोरणाचा भाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या भरतीमध्ये एमबीबीएस व एमडी डॉक्टर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, ईसीजी व एक्स-रे तंत्रज्ञ तसेच इतर तांत्रिक पदांचा समावेश आहे. मात्र, सर्वच पदांसाठी केवळ ८९ दिवसांच्या तात्पुरत्या करारावर नियुक्ती देण्यात येणार असून, कायमस्वरूपी नोकरी, सेवेत सातत्य किंवा भविष्यातील सुरक्षिततेची कोणतीही हमी देण्यात आलेली नाही.
नियुक्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवली जाणार असून, एका दिवसाच्या अनुपस्थितीवरही वेतन कपात करण्याची अट ठेवण्यात आली आहे. तसेच काम समाधानकारक नसल्याचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडून ९३४ रुपयांचे अर्ज शुल्क आकारले जात असून, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारावर स्वाक्षरी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार अप्रत्यक्षपणे मर्यादित केला जात असल्याचा आरोप होत आहे.
कूपर रुग्णालयातील ही भरती मोहीम केवळ तरुणांच्या भवितव्याला धक्का देणारी नसून, सरकारी रुग्णालयांना कंत्राटी व्यवस्थेच्या कारखान्यांमध्ये रूपांतरित करण्याचा धोकादायक पायंडा ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026
मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. जन स्वास्थ्य अभियानाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहायक, लॅब आणि एक्स-रे तंत्रज्ञ, परिचारिका, वॉर्ड बॉय तसेच स्वच्छता कर्मचारी अशा सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया आणि दैनंदिन सेवा यांचा वेग मंदावला आहे.
या तीनही रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज बारा हजारांहून अधिक रुग्ण येतात, त्यापैकी पाचशे ते सहाशे रुग्णांना दररोज दाखल करावे लागते. केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त आहेत. सायन रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकांची संख्या अत्यल्प असून नायर रुग्णालयातही विविध विभागांत मोठी पोकळी आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका गरीब आणि गरजू रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे. स्थायी भरती करण्याऐवजी ठेक्यांवर भर देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे, असे मत जन स्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण धोरणातील बदलांमुळे प्राध्यापका भरतीला विलंब झाला असून लवकरच नियुक्त्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंदाडे यांनी दिली आहे.
सायन रुग्णालयातील रिक्त पदे: सायन रुग्णालयात ९९ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ५४ पदे रिक्त आहेत. १३८ सहयोगी प्राध्यापक पदांपैकी ४० पदे रिक्त आहेत. २२५ सहाय्यक प्राध्यापक पदांपैकी १५३ पदे रिक्त आहेत. सर्व २३ प्रयोगशाळा सहाय्यक पदे रिक्त आहेत. ७१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांपैकी दहा पदे, ४४ एक्स-रे तंत्रज्ञ पदांपैकी १९ पदे रिक्त आहेत. शिवाय, ४४ औषध वितरक पदांपैकी २३ पदे रिक्त आहेत
नायरमधील रिक्त पदे:नायर रुग्णालयात, प्राध्यापकांच्या ७८ पैकी ३१ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या ११५ पैकी २९ पदे रिक्त आहेत आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या १८४ पैकी १३२ पदे रिक्त आहेत. लॅब टेक्निशियनच्या ६६ पैकी ३० पदे, एक्स-रे टेक्निशियनच्या ४५ पैकी २८ पदे आणि परिचारिकांच्या ९९ पैकी २७ पदे रिक्त आहेत
केईएममध्ये प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त:केईएम रुग्णालयातील प्राध्यापकांच्या १०६ मंजूर पदांपैकी ४० रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या १६८ पदांपैकी ५० पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहायकांच्या ३३ पैकी सर्व पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या २७ पैकी १० पदे रिक्त आहेत. सहायक तंत्रज्ञांच्या ७२पैकी ६१ पदे रिक्त आहेत. एक्स-रे तंत्रज्ञांच्या ५२ पैकी ३० पदे रिक्त असून परिचारिकांची १३ पदे रिक्त आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















